निर्णय कोणाचा ?


मागच्या आठवड्यात अलिगढमध्ये एका कार्यक्रमात बोलताना बाबा रामदेव ह्यांनी देशाच्या लोकसंख्ये विषयी चिंता व्यक्त केली आणि वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी - दोन पेक्षा जास्त मुले असणार्‍यांचा मतदानाचा अधिकार काढून घ्यावा त्यांना निवडणुकीला उभे राहण्याची मनाई करावी तसंच सरकारी शाळा -रुग्णालयांचा लाभ घेऊ देऊ नये, सरकारी नोकरीत स्थान मिळू नये असे निर्बंध घालण्याची सूचना केली! रामदेवबाबांनी यापूर्वी देखील अशा प्रकारची भडक मतं व्यक्त केलेली आहेत आणि त्यावेळीसुद्धा त्यांच्या मतांना पाठींबा देणारे अनेक लोक होते – त्याचप्रमाणे आत्ताही अनेकांचा त्यांच्या सूचनेला पाठिंबाच मिळाला ! पण दुसर्‍याच दिवशी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी त्यांच्या राज्यातील लोकांना दोनपेक्षा अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले. इतकेच नव्हे तर दोनपेक्षा जास्त मुले जन्माला घालणार्‍या जोडप्यांना काही विशेष सोयीसवलती देण्यात येतील – असेही जाहीर केले. चंद्राबाबूंच्या या आवाहनावर अर्थातच भरपूर टीका झाली – काही वर्षांपूर्वी साक्षीमहाराज नावाच्या भाजप नेत्याने हिंदू महिलांना चार मुले जन्माला घालायचे आवाहन केले होते – त्याचीही आठवण काही लोकांना यामुळे झाली. पण चंद्राबाबूंच्या आवाहनाला त्यांच्या राज्यातल्या कमी होत चाललेल्या लोकसंख्या दराची आणि त्यामुळे केंद्र सरकारकडून मिळणार्‍या आर्थिक मदतीमध्ये घट होत असल्याची पार्श्वभूमी आहे. रामदेवबाबा आणि चंद्राबाबू ह्यांच्या दोन टोकांच्या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे देशाची लोकसंख्या आणि त्यावरची नियंत्रणे याविषयीची चर्चा पुन्हा सुरू झाल्या पण ह्या सगळ्या चर्चांमध्ये एका मुद्दा नेहमीप्रमाणेच हरवून गेला होता – तो म्हणजे लोकसंख्या नियंत्रणातला महिलांचा सहभाग! आपल्या देशात अजूनही अनेकांची अशी समजूत असते की जणू काही वाढती लोकसंख्या हीच देशाची मुख्य समस्या आहे! या समजुतीला आधार देण्यासाठी असं सांगितलं जातं की 2030 सालापर्यंत भारताची लोकसंख्या 1.5 अब्ज होणार आहे आणि त्यामुळे तो जगातला सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश ठरेल. सध्या चीनची लोकसंख्या जगात सर्वाधिक आहे. आपल्या देशाची लोकसंख्या चीनपेक्षा जास्त होणे ही एक लाजिरवाणी बाब आहे – अशा प्रकारे ही वस्तुस्थिती मांडली जाते. दारिद्र्य, अज्ञान, रोगराई, बेरोजगारी अशी कुठलीही समस्या चर्चेला आली की लोकसंख्येचे कारण पुढे केले जाते. म्हणून देशाच्या लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी काहीनाकाही कठोर उपाय केले जावेत अशा सूचना वेगवेगळ्या व्यक्ति आणि समूहाकडून वारंवार केल्या जात असतात. महिनाभरपूर्वी उद्योगपती जिंदाल यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी कडक उपाय योजावेत यासाठी पंतप्रधानांकडे विनंती केली होती. त्याच सुमारास 125 खासदारांच्या एका पथकानेदेखील राष्ट्रपतींना असेच निवेदन दिले होते. त्याआधी 2017 मध्ये भाजप खासदार लखनपाल यांनीसुद्धा लोकसंख्या नियंत्रणासाठी एक खासगी विधेयक सादर केलेले होते. या सगळ्या निवेदनात किंवा मागण्यांमध्ये नेहमी “कठोर उपाय” करण्याची सरकारला विनंती केली जाते. बरेचदा हे तथाकथित तोडगे म्हणजे एकूण प्रजनन दर कमी करण्यासाठी गर्भंनिरोधनाच्या साधनांची सक्ती करण्याविषयीचे नियमच असतात. काही वेळा ही साधने वापरण्यासाठी बक्षिसे घोषित करून तर काहीवेळा साधने न वापरल्याबद्दल शिक्षेचा बडगा दाखवून ही सक्ती अमलात आणली जाते. पण बहुतांशवेळा ह्या धोरणांमध्ये मूल जन्माला घालण्याची सामाजिक जबाबदारी उचलणार्‍या स्त्रियांचा विचार मात्र क्वचितच केला जातो.
चीनमध्ये काही वर्षांपूर्वी वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी प्रत्येक जोडप्याला एकच मूल होऊ देण्याचे धोरण राबवण्यात आले होते. जवळजवळ 35 वर्षे हे धोरण राबवले गेले आणि त्याचे अनेक दुष्परिणाम देखील समोर आले. त्यातला एक मोठा दुष्परिणाम म्हणजे चीनच्या लोकसंख्येतील लिंगगुणोत्तर म्हणजेच स्त्री-पुरूषांचे प्रमाण बिघडले. कारण भारताप्रमाणेच चीनमध्येही मुलींपेक्षा मुलाला प्राधान्य दिले जात असल्याने लोकसंख्या नियंत्रणाच्या काळात गर्भपात करून मुलींचे गर्भ नष्ट करण्यावर चीनी कुटुंबांनी भर दिला. अशा प्रकारे जेव्हा वारंवार गर्भपाताला सामोरे जावे लागते तेव्हा अर्थातच स्त्रियांच्या आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होतात. अशा प्रकारे एक किंवा दोन मुले व्हावीत यासाठी आक्रमक अंमलबजावणी करताना स्त्रीयांचे मानवी हक्क डावलले जातात यांचेही भान राज्यकर्त्यांना राहत नाही. आपल्या देशातसुद्धा अनेकदा गर्भपाताचा वापर कुटुंबनीयोजनाच्या साधनासारखाच केला जातो. ऐंशीच्या दशकात डेपोप्रोवेरा आणि नेट एन सारख्याऔषधांची आयात आपल्या देशात सरकारी पातळीवर करण्यात आली होती. काही स्त्रीवादी संघटनानी त्याच्या दुष्परिणामा विरुद्ध आवाज उठवल्या नंतर ती सरकारी आरोग्य केंद्रातून वापरली जाणे बंद केले गेले होते. पण खासगी पातळीवर अशा प्रकारची औषधे मिळतच राहिली असे काही डॉक्टर्स सांगतात. अनेकदा स्त्रियांना माहिती न देता, त्यांच्या परवानगीशिवायच त्यांच्या शरीरात गर्भनिरोधक इंप्लांट बसवून टाकली जातात अशी उदाहरणे आफ्रिकन देशांमध्ये घडलेली आहेत. काही संप्रेरकयुक्त औषधांचे दुष्परिणाम तर कर्करोगाची शक्यता दाखवते. याशिवाय मासिक पाळी अनियमित होणे, मोठ्या प्रमाणात वजन वाढणे आणि हाडं ठिसूळ होने हे दुष्परिणाम तर अनेक महिलांनी अनुभवलेले आहेत. यातल्या काही औषधांबद्दल अधून मधून आवाज उठवला जातो आणि कधीकधी यातली काही औषधे बाजारातून काढून घेतली जातात. पण एका देशात बंदी आली की काही औषधे इतर देशात खपवायचा प्रयत्न केला जातो.
खरं म्हणजे कंडोम आणि पुरुष नसबंदी ही दोन पुरूषांना वापरता येण्याजोगी आणि दुष्परिणाम नसलेली अशी साधने आहेत. पण जगभरात ह्या दोन्ही साधनांचा वापर फक्त 15% इतक्या कमी प्रमाणात केला जातो. आपल्या देशात पुरुष नसबंदीचा मर्दानगीवर दुष्परिणाम होत असल्याची समजूत असल्यामुळे पुरुष अगदी क्वचितच ही शस्त्रक्रिया करून घेतात. गेल्या सत्तर वर्षात स्त्रियांनी वापरण्याच्या गर्भनिरोधक साधनामध्ये खूप भर पडली पण कंडोमचा शोध लागल्यानंतर पुरुषांसाठी एकही नवीन साधनाचा शोध लागलेला नव्हता. दीड वर्षापूर्वी पुरुषांकरिता तोंडवाटे घेण्याच्या गर्भनिरोधक गोळीचा शोध लागल्याचे आपण सर्वांनी ऐकले होते. पण आजमितीला किती पुरुषांनी ह्या गोळीचा उपयोग केला ते आपल्याला माहीत आहे का? ती गोळी अजून बाजारात आली आहे किंवा नाही याबद्दलही कोणाला माहिती नाही! भारतात कंडोम्सच्या वापराचे प्रमाण देखील दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहे. संतती नियमनाची जबाबदारी पुरुषांवर आहे असे पुरुषप्रधान व्यवस्थेत मानलेच जात नाही. पण स्त्रियांची लैंगिकता आणि जननक्षमता यांच्यावर पुरुषांचा अधिकार असण्याला मात्र समाजाची मान्यता असते! त्यामुळे कुटुंबनियोजनाची साधने वापरायची जबाबदारी स्त्रियांवर ढकलली जाते पण त्याविषयीच्या निर्णय प्रक्रियेत मात्र त्यांना सामावून घेतले जात नाही.
सरकारी आकडेवारीच्या विश्लेषणातून असे दिसून येते की जर भारतातल्या वाढत्या लोकसंख्येला आळा घालायचा असेल तर जन्माला आलेली मुले जगण्याचा दर वाढला पाहिजे. कारण जर आपले मूल जगण्याची खात्री असेल म्हणजे जीवनमान उंचवलेले असेल तेव्हा लोक कमी मुले होऊ देण्याचा निर्णय स्वयंप्रेरणेने घेतात. त्याखेरीज स्त्रीयांचे शिक्षण हा देखील एक महत्त्वाचा घटक त्यांच्या संतती नियमनाच्या निर्णयाला कारणीभूत असतो – असे जगभरातल्या अनेक अभ्यासात दिसून आलेले आहे. अगदी आपल्याच देशात केरळ, आंध्रप्रदेश अशा दक्षिणेकडच्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणाचे लक्ष्य चांगल्या प्रकारे गाठलेले आहे. पण लोकसंख्येच्या निकषावर त्याच राज्यांना आता केंद्राकडून आर्थिक लाभ मात्र कमी प्रमाणात देण्यात येणार आहेत. म्हणून चंद्राबाबू नायडू आता दोन पेक्षा जास्त मुले होऊ देणार्‍य जोडप्यांना बक्षिसे जाहीर करू लागले आहेत. पण दोनपेक्षा जास्त मुलांचे संगोपन करण्याचे कष्ट कोण करणार आहे – कुटुंबातील स्त्रिया की पुरुष? थोडक्यात काय तर लोकसंख्येच्या दरातील वाढ असो किंवा घट दोन्ही धोरणांचा भार मात्र पडणार आहे स्त्रियांवरच!